श्रीदत्तकैवल्य याग सेवा ( Shree Datta kaivalyayag Seva )
सद्गुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) कृपाशिर्वादाने शनिवार, दि. १७ एप्रील २०१०, म्हणजेच अक्षयतृतियेच्या दिवसापासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे "श्रीदत्तकैवल्य याग सेवा" सुरू करण्यात आली. श्रीगुरुदत्तात्रेय श्रद्धावानाच्या मनात असलेली सद्गुरुतत्वाची भक्ती दृढ करण्याचं कार्य करत असतात. श्रीदत्तकैवल्य यागात सहभागी झाल्यामुळे श्रीदत्तात्रेयांचा आशिर्वाद श्रद्धावानांना लाभतो आणि त्यांची सद्गुरुभक्ती दृढ होते. मनात सतत सदगुरु स्मरण राहण्याच्या दिशेने तो प्रगती करतो...आणि श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे,
ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण। त्यासी कैचें भय दारुण।
काळमृत्यु न बाधे जाण। अपमृत्यु काय करी॥
हा अपमृत्यु फक्त मानवी शरीराचाच नाही तर त्याच्या कार्याचा, यशाचा, धनाचा, कीर्तीचा, अशा कुठल्याही गोष्टीचा अपमृत्यु श्रीगुरुकृपेने टळतो.
ह्या यागाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
हा याग प्रत्येक शनिवारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रमच्या प्राकारात सायंकाळी ६.३० ते ८.०० ह्या वेळेमध्ये संपन्न होतो. एकावेळी एकूण १० श्रद्धावान ह्या यागामध्ये सहभागी होऊ शकतात. ह्या यागामध्ये मुख्यत: पुरुष व काही विशिष्ट परिस्थितीत स्त्रियाही सहभागी होऊ शकतात.
ह्या यागामध्ये सहभागी होणा-या श्रद्धावानांनी यागाच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मध्ये हजर रहावयाचे असते. यागाला बसताना 'श्रद्धावान पोषाख' अनिवार्य आहे. यागाची तयारी करण्यामध्ये व याग संपन्न झाल्यावर पूजेची मांडणी आवरण्यामध्ये तसेच पूजेची भांडी स्वच्छ करण्यामध्येही पूजकांनी हातभार लावावयाचा असतो.
श्रीदत्तकैवल्य यागाची मांडणी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्च्या प्राकारात श्रीत्रिविक्रमासमोर केली जाते. मांडणीमध्ये एका टेबलवर गव्हाची रास केली जाते व त्यावर एक तांब्याचा कलश ठेवला जातो. कलशामध्ये पाणी, अक्षता व सुपारी ठेवली जाते. मग कलशावर आंब्याचा डहाळ ठेवून त्यावर श्रीफळ ठेवले जाते. कलशावर व श्रीफळावर अष्टगंधाने ॐ काढला जातो. त्यानंतर कलशास काशाय वस्त्र परिधान केले जाते व उपरणं आणि हार / वेणी / गजरा इत्यादींनी त्यास सजवले जाते. हा कलश म्हणजे दत्तगुरूंचे, गुरुतत्वाचे प्रतिकात्मक स्वरूप मानले जाते.
कलशाच्या ह्या मांडणीसमोर होमाची मांडणी केली जाते. होमासाठी तूप व समीधा ही हवन सामग्री वापरण्यात येते.
श्रीदत्तकैवल्य याग विधी:
१) प्रत्येक पूजकाला नाम काढले जाते.
२) प्रथम "वक्रतुण्ड महाकाय..." हा मंत्र एकदा म्हटला जातो.
३) त्यानंतर "पद्मासीनं श्यामवर्णम..." हा सदगुरु ध्यानमंत्र एकदा म्हटला जातो.
४) त्यानंतर "श्रीगणपती अथर्वशीर्ष" हे स्तोत्र म्हटले जाते.
५) ह्यानंतर यागासाठी नोंदणी केलेल्या १० श्रद्धावान भक्तांना (पूजकांना) सुवासिक फुलांच्या पाकळ्या व अक्षतांनी भरलेली ताम्हनं दिली जातात. सर्व पूजक कलशाच्या मांडणीभोवती गोल उभे राहतात व रामरक्षा हे स्तोत्र एकदा म्हणण्यात येते. ह्या स्तोत्रपठणाच्या वेळी पूजकांनी कलशावर फुलांच्या पाकळ्या व अक्षता अर्पण करावयाच्या असतात.
६) हा विधी पूर्ण झाल्यावर १० पूजकांपैकी ५ पूजकांनी होमकुंडाभोवती बसावे व श्रीदत्तमालामंत्राचे २६ वेळा पठण होतेवेळी होमकुंडात तूप व समीधा ह्यांची आहुती द्यावी. २६चे आवर्तन झाल्यावर ह्या ५ पूजकांच्या जागेवर उर्वरीत ५ पूजकांनी बसावे व पुन्हा वरीलप्रमाणे श्रीदत्तमालामंत्राचे २६ वेळा पठण होतेवेळी होमकुंडात तूप व समीधा ह्यांची आहुती द्यावी.
७) ह्यानंतर सर्व १० पूजकांनी होमकुंडाभोवती उभे रहावे. "ॐ पूर्णमद: पूर्णमिदं..." हा मंत्र ७ वेळा म्हटला जातो व त्यावेळी तुळस, बेल व गूळ असलेली खोब-याची वाटी ठेवलेले एक मोठे तबक पूजकांच्या हातातून फिरवले जाते. ७ वेळा मंत्रपठण झाल्यावर तबकातील साहित्य होमकुंडात अर्पण केले जाते.
८) त्यानंतर एका छोट्या तांब्यामध्ये दूध घेऊन "ॐ रामाय स्वाहा इदं न मम" हा मंत्र ३ वेळा म्हणताना दूध होमकुंडात अर्पण केले जाते व अग्नी शांत केला जातो.
९) त्यानंतर पुन्हा पूजकांना सुवासिक फुलांच्या पाकळ्या व अक्षतांनी भरलेली ताम्हनं दिली जातात. सर्व पूजक कलशाच्या मांडणीभोवती गोल उभे राहतात व "श्रीदत्तात्रेय स्तोत्र" हे स्तोत्र ६ वेळा म्हणण्यात येते. ह्या स्तोत्रपठणाच्या वेळी पूजकांनी कलशावर फुलांच्या पाकळ्या व अक्षता अर्पण करावयाच्या असतात. अशी धारणा आहे की स्वत: नारदमुनींनी रचलेल्या ह्या १८ श्लोकांच्या स्तोत्राच्या पठणाच्या वेळेस श्रीदत्तात्रेय तिथे हजर असतात व ह्या स्तोत्राच्या श्रवणाने मनुष्याच्या तीनही (मनोमय-प्राणमय-अन्नमय) देहातील शक्तीकेंद्रे जागृत होतात. हे स्तोत्र ६ वेळा म्हणायचे आहे कारण श्रीदत्तात्रेय षडभुज आहेत. आपल्याला जाणवो अथवा न जाणवो, पण प्रत्येकवेळी स्तोत्र म्हणताना त्यांच्या ६ हातांपैकी एका हाताचा आपल्याला स्पर्श होतोच.
१०) हा विधी झाल्यानंतर प्रत्येक पूजकाच्या हातामध्ये आरती प्रज्ज्वलित केलेले ताम्हन दिले जाते व "त्रिगुणात्मक त्रैमूर्ती" आणि "आरती श्रीगुरुदत्ताची" ह्या आरती म्हटल्या जातात. आरती म्हणतेवेळी पूजकांना कलशाभोवती उभे राहून आरती ओवाळावयास मिळते.
११) आरतीनंतर "सद्गुरुपद" (पाळणा), "शांतीपाठ" व "दिगंबरा दिगंबरा..." हा गजर घेऊन सांगता केली जाते.
१२) ह्यानंतर सर्व पूजकांनी मांडणीसमोर साष्टांग नमस्कार घालावयाचा असतो.
पूजेचे सर्व साहित्य श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्तर्फे देण्यात येते. सेवेच्या दिवशी, आगाऊ नोंदणी केलेल्या श्रद्धावानाला यागाच्या पूजाविधींमध्ये सहभागी होता येते व त्याचबरोबर त्या व्यक्तीचे आप्त/नातेवाईक याग संपन्न होतेवेळी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्मध्ये उपस्थित राहू शकतात.
श्रीमातृवात्सल्यविंदानम ह्या पवित्र ग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे ह्या कलियुगाच्या नियंत्रणाची जबाबदारी आदिमाता अनसूयेने संपूर्णपणे श्रीदत्तात्रेयांवर सोपविली आहे. तसेच श्रीदत्तात्रेयास आशीर्वाद देताना अनसूयामाता म्हणते, "हे दत्तात्रेय ! तू तुझ्या अनुजाच्या अर्थात ह्या परमात्म्याच्या सहाय्याने आता (ह्या कलियुगाचा) नियंता बनशील", व ह्याच अनसूयामातेच्या शापाच्या प्रभावाने कलीपुरुषास श्रीगुरुभक्तांच्या वाटेस कधीच जाता येणार नाही.