गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ६

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.

 

भूतकाळ येऊन आदळत राहतो ना जो जीवनामध्ये, बरोबर. साधी गोष्ट आहे, अगदी साधं उदाहरण. नवीन-नवीन लग्न झालेलं आहे. पत्नीच्या समोर बढाया मारलेल्या आहेत, मी किती शूर आहे, अमुक आहे, तमुक आहे आणि एकदम जुनी शेजारची शेजारीण येऊन भेटते जुन्या बिल्डिंगमधली. ‘अरे कोण हं रम्या का तू, अरे वा छान-छान-छान, ही कोण? लग्न झालं वाटतं!’ हिरव्या चुडा वैगरे वरून कळत असतं नेहमी, पण विचारल्या शिवाय पुढच्या गोष्टी सुरू होत नाहीत, ‘अगं खूप चांगला आहे बरं का, खूप चांगला आहे स्वभावने, तुला खूप सुखी करील. एवढा खट्याळ होता ना लहानपणी तुला सांगते, काही विचारू नकोस आणि तुला गंमत सांगते हा ना एक नंबरचा भित्रा होता. रात्री, अगं, रात्री आमच्या तिकडे खाली झाड होतं ना, त्या झाडाच्या खालून बाहेर पडायचं असतं ना, तेव्हा मला हाक मारायचा, ‘मावशी जरा येता का माझ्याबरोबर’. झालं! लागली वाट, ‘दुसरं तुला सांगते, पक्का चावट गं, अगं तेरा-चौदा वर्षाचा होता तेव्हा बाण करून पोरींना मारायचा.’ काय झालं! बायको येऊन काय करणार घरी? बरोबर, तुमचे सगळे बाण काढून घेणार. हे एक उदाहरण झालं, आपल्या मनाला हलकं फुलकं कळावं म्हणून.

हा भूतकाळ येऊन आदळला ना, बरोबर किंवा सांगितलं, ‘अगं मी केवढा हुशार होतो शाळेमध्ये.’ नेमक्या शाळेतल्या मास्तरीण बाई येतात, ‘मुलांना मात्र नीट वाढव हं, तू जसा शाळेत अभ्यास न करता फिरायचास, तसा फिरू नकोस,’ खडूस मास्तरीण सांगते. येऊन आदळला ना भूतकाळ, बरोबर.

जर हा मंत्र आम्ही म्हणत असू, मुद्दाम साध्यातलं साधं उदाहरण घेतलं, सोप्यातलं सोपं उदाहरण घेतलंय, त्या मास्तरणीच्या बरोबर हा मंत्र येणार पुढे चालत आणि काय करणार, ही जी तिची वाणी असेल किंवा त्या शेजारणीची वाणी की हा घबरट होता, हा पोरींना बाण मारायचा. केली असेल लहानपणी चूक ठीक आहे किंवा शाळेत अभ्यास करायचा नाही, पण त्या मुलांच्या समोर कशाला वाभाडे काढता. ते पन्नास टक्के नक्की कमी होईल.

आधीच्या ठिकाणी केलेल्या चुका दूसर्‍या ठिकाणी येऊन आदळणार नाहीत. तुम्ही सुधारायचं ठरवलंय, आधी चूक झालेली आहे, मग ती चूक तिथून पुढे येताना तुमच्या अंगावर कमीत कमी पन्नास टक्के कमी वजनाने आदळेल, आलं लक्षामध्ये.

साधी गोष्ट उदाहरण काय, आधीच्या ऑफिसमध्ये मनुष्य काम करत होता, तिकडे भांडखोरपणा केला म्हणून ऑफिसने काढून टाकलं. दुसर्‍या ऑफिसमध्ये गेल्यानंतर, दुसर्‍या ऑफिसच्या बॉसच्या मुलाचं लग्न पहिल्या ऑफिसच्या मुलीशी होणार नाही की जिकडे तुम्ही कटात सापडलात, पेचात सापडलात, ‘अरे हा तुझ्याकडे आहे नोकरीला, अरे बाप रे, महाभांडखोर माणूस आहे, ह्याच्यावर विश्वास ठेऊ नकोस.’ गच्छंती तुमची, बरोबर! हे होणार नाही, म्हणजेच काय आमच्या भूतकाळाच्या पुढेसुद्धा हा अग्रगण्य सेनापती आमचा चालत राहतो.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll