नवरात्रिपूजन करण्याची शुद्ध, सात्त्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम पवित्र पद्धती

भाग २        नवदुर्गा पूजन        हिंदी    

दिनांक १४ सप्टेंबर २०१७ च्या ’दैनिक प्रत्यक्ष’ मधील अग्रलेखात दिल्याप्रमाणे ’नवरात्रीपूजनाचे’ विधीविधान खालीलप्रमाणे आहे. हिंदी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये हे विधीविधान देण्यात आले आहे. प्रत्येक श्रद्धावान आपल्या घरी अशा प्रकारे नवरात्रीपूजन करु शकतो. 

व्हिडिओ     

नवरात्रिपूजन

प्रतिष्ठापनाः

१)     नवरात्रीच्या प्रथम दिवशी पूजनास प्रारंभ करण्याआधी इष्टिकेस सर्व बाजुंनी गेरूचा लेप व्यवस्थित लावावा. (अंबज्ञ इष्टिका असल्यास ही कृती करायची गरज नाही)

२)   तद्नंतर एका परातीत आवश्यक तेवढी मृत्तिका घेऊन त्यात थोडेसे पाणी शिंपडावे.

३)     ती माती नीट ओली झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे दाणे पेरावेत व त्यावर परत थोडेसे जल व मृत्तिका ह्यांचे सिंचन करावे.

४)    तद्नंतर एखाद्या पाटावर किंवा टेबलावर किंवा चौरंगावर एखादे सोवळे किंवा हिरव्या रंगाचा खण (चोळीखण) अंथरावा.

      -     त्या स्थानाखाली व भोवती किमान रांगोळी असणे आवश्यक.

५) ‍    तद्नंतर ‘जय जगदंब जय दुर्गे’ असा गजर करीत ही परात त्या पूजास्थानावर ठेवावी.

      (पाट/चौरंग/टेबल)

६)    तद्नंतर इष्टिकेचा तिचा सपाट भाग आपल्यासमोर येईल अशा रितीने त्या गोधूम (गहू) मिश्रित मृत्तिका असलेल्या परातीत ठेवावी.

७)     तद्नंतर त्या इष्टिकेच्या सपाट भागावर काजळाने देवीचे डोळे, नाक व ओठ रेखांकित करावेत.

८)     तद्नंतर ह्या इष्टिकेवर आपल्या आवडीच्या रंगाची एक चुनरी, मस्तकावरील पदराप्रमाणे अर्पण करावी.

दुसर्‍या दिवशीपासून, नित्य पूजनामध्ये श्रद्धावान चुनरी किंवा ब्लाऊज पीस अर्पण करु शकतात. अर्पण केल्यानंतर हे ब्लाऊज पीस अंबज्ञ इष्टिकेवर न ठेवता अंबज्ञ इष्टिकेच्या एका बाजूला ठेवावेत. म्हणजे पहिल्या दिवशी अर्पण करण्यात आलेली चुनरी अंबज्ञ इष्टिकेवर पूजनाचे सर्व दिवस राहील व अर्पण केलेले ब्लाऊज पीस अर्पण करुन झाल्यावर बाजूला काढून ठेवता येतील. ​​(दिनांक - २७ सप्टेंबर, २०१९)

अधिक वाचा

९)    तद्नंतर एक तुलसीपत्र व एक बेलपत्र त्या इष्टिकेच्या दोन्ही बाजूंस मातीत रोवावे - आता ही ‘अंबज्ञ इष्टिका’ अर्थात ‘मातृपाषाण’ अर्थात ‘आदिमाता दुर्गेचे पूजनप्रतीक’ तयार झाले आहे.

१०)  ज्यांची इच्छा असेल, त्यांनी आपापल्या कुलदेवतेची तसबीर, टाक किंवा मूर्ती ह्या पवित्र परातीच्या मागे किंवा पुढे सोयीनुसार ठेवावी.

-     मोठी तसबीर असल्यास ती शक्यतो मागे लावावी आणि टाक व छोटी मूर्ती परातीसमोर एका छोट्या ताम्हनात कुंकुममिश्रित अक्षतांवर ठेवावी.

११)    तद्नंतर आपापल्या सोयी व इच्छेनुसार दांपत्याने किंवा एकट्या व्यक्तीने श्रद्धावान पेहरावात समोर बसावे किंवा उभे रहावे.

            दुसर्‍या दिवशीपासूनचे पूजन घरातील अन्य कोणताही सदस्य करू शकतो. तसेच रोज घरातील वेगवेगळा सदस्यही पूजन करू शकतो. १४ वर्षांवरील कोणीही हे पूजन करू शकतो.

१२)  तद्नंतर त्या आदिमातास्वरूप ‘अंबज्ञ इष्टिके’स ‘ॐ नमश्चण्डिकायै’ असे म्हणत हळद व कुंकू लावावे.

१३)  नंतर हात जोडून ‘ॐ गं गणपतये नमः’ हा जप पाच वेळा करावा.

१४)  तद्नंतर नवदुर्गांची ‘नाममंत्रमाला’ एकदा किंवा तीनदा किंवा पाचदा किंवा नऊ वेळा म्हणत त्या आदिमातेस कुंकुम अक्षता, हरिद्रा (हळद) अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे व पुष्पे अर्पण करावीत.

१५)   नवदुर्गा-नाममंत्रमाला म्हटल्याने, पूजनात अजाणतेपणी काही चुका घडल्यास त्यांचे निराकरण होते.

१६)   आदिमातेस वेणी किंवा गजरा दररोज अर्पण करण्यास हरकत नाही.

१७)   त्यानंतर झेंडूच्या फुलांची एक माळ त्या परातीभोवती घालावी.

१८)    तद्नंतर पुरणा-वरणाचा नैवेद्य अर्पण करावा.

-     वरणभात व पुरण ह्यांशिवाय आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार कुठलेही भोजनपदार्थ जरूर अर्पण करावेत. मात्र शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी शाकाहारी नैवेद्यच अर्पण करणे श्रेयस्कर. भोजनाच्या अन्य पदार्थांमध्ये कांदा-लसुणाचे पथ्य नाही. मांसाहार शक्यतो टाळावा.

-     मात्र नैवेद्य अर्पण करताना पुरणावरच तुलसीपत्र ठेवावे.

१९)  तद्नंतर ‘माते गायत्री सिंहारूढ भगवती महिषासुरमर्दिनी....’ ही आरती दीप प्रज्वलित करून करावी.

-     ह्यावेळेस इतर कुठल्याही आरत्या घेऊ नयेत.

-     पहिल्या दिवशी रात्रीदेखील ही आरती करणे आवश्यक आहे. त्यानंतर दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून वाटावा.

२०)    ह्यानंतर ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त....’ ही मंत्रपुष्पांजली म्हणून उपस्थित सर्वांनी पुष्पे, बिल्वपत्रे व तुलसीपत्रे अर्पण करावीत.

२१)    तद्नंतर आदिमातेस धूप दाखवावा.

२२)    मग लोटांगण घालावे.

२३)    मातीवर रोज पाणी शिंपडणे.

व्हिडिओ     

नित्यपूजनः

२४)    पहिल्या दिवशी हे पूजन सकाळी करावे.

      -     त्यानंतर ‘१३’ क्रमांकापासूनचे सर्व उपचार करून रोज सायंकाळी पूजन करावे.

      -     नित्यपूजन स्नान करून श्रद्धावान वेषात करावे.

२५)    मात्र पुढील दिवशी पूजन करताना आधीची चुनरी तशीच ठेवून, त्यावर दररोज एक एक वेगवेगळ्या रंगाची चुनरी आरतीच्या आधी अर्पण करावी.

      (सर्व चुनर्‍या एकाच रंगाच्या असल्या तरी चालेल.)

२६)    इतर दिवशी जेव्हा सायंकाळी पूजन होणार तेव्हा रोज सकाळी दूध-साखरेचा नैवेद्य जरूर अर्पण करावा.

२७)   कधी कधी नवरात्रतिथी फक्त आठ दिवसांमध्ये येतात तेव्हा विजयादशमीच्या आदल्या दिवशी दोन चुनर्‍या अर्पण कराव्यात. एखाद्या वर्षी नवरात्रतिथी नऊऐवजी दहा दिवस आल्या तर वाढत्या क्रमाने चुनरी अर्पण कराव्यात. (एकूण १० चुनर्‍या अर्पण केल्या जातील.)

२८)  नवदुर्गा-नाममंत्रमाला

ॐ श्री शैलपुत्र्यै नम:।

ॐ श्री ब्रह्मचारिण्यै नम:।

ॐ श्री चन्द्रघण्टायै नम:।

ॐ श्री कूष्माण्डायै नम:।

ॐ श्री स्कन्दमात्रे नम:।

ॐ श्री कात्यायन्यै नम:।

ॐ श्री कालरात्र्यै नम:।

ॐ श्री महागौर्यै नम:।

ॐ श्री सिद्धिदात्र्यै नम:।

२९)   सायंकाळी आरती करताना विविध आरत्या घेण्यास हरकत नाही.

      - ह्या वेळी कुठल्याही क्रमाने आरत्या करू शकतो.

पुनर्मिलापः

३०)   विजयादशमीच्या दिवशी सकाळी आदिमातेस हळदीकुंकू अर्पण करून दूध-साखर व पुरण एवढाच नैवेद्य अर्पण करावा

      व मग अक्षता व फुले अर्पण करून आदिमातेची स्वतःच्या शब्दांत क्षमायाचना व कृपायाचना करावी.

३१)  आणि मग दोन्ही हात जोडून पुढील मंत्र म्हणावा.

       आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्।

       पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्‍वरि॥

३२)  मग स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालताना पुढील मंत्र म्हणावा.

        यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च।

        तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण्यां पदे पदे॥

३३)    त्यानंतर आपल्या तीन स्व-प्रदक्षिणा झाल्यानंतर, परातीमध्ये उगवलेल्या रोपांवर दुधाचे फुलाने सिंचन करावे व आदिमातेच्या मस्तकावर कुंकुम अक्षता अर्पण करताना ‘गुरुक्षेत्रम् मंत्र’ म्हणावा व परात थोडीशी सरकवावी.

३४)    ह्यानंतर आपण स्वेच्छेनुसार व सोयीनुसार त्या अंबज्ञइष्टिकेचा जलात पुनर्मिलाप करावा व त्या परातीतील थोडीशी माती तुळशीच्या रोपास अर्पण करावी आणि परातीत आलेल्या रोपांतील एक रोप तुळशीच्या कुंडीत लावावे. बाकी सर्व विसर्जनास.

-     पुनर्मिलापपूजनानंतर विजयादशमीचा दिवस किंवा पुढील तीन दिवसांत कधीही अंबज्ञइष्टिकेचा जलात पुनर्मिलाप करावा. मात्र पुनर्मिलाप होईपर्यंत रोज सकाळ-संध्याकाळ दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा.

*     घरामध्ये सोयर-सुतक असतानाही हे पूजन करू शकतो.

*     मासिक पाळीच्या काळात स्त्रिया दर्शन घेऊ शकतात व नमस्कार करू शकतात.

*     नवरात्रिच्या काळात स्वतःच्या राहत्या घराशिवाय अन्य स्थळी निवास असल्यास पूजन करू शकतो.

*     नवरात्रिच्या काळात घरातील किंवा नात्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास नवरात्रिपूजन सुरू ठेवायचे अथवा नाही ह्याबाबत श्रद्धावानांना स्वातंत्र्य आहे; परंतु मध्येच पुनर्मिलाप करायचा असल्यास ‘आदिमाता शुभंकरा स्तवनम्’ ११ वेळा म्हणून, मग अक्षता वाहून, तद्नंतर पुनर्मिलाप करावा.

*     एखाद्याने आपल्या घरात एका वर्षी हे नवरात्रिपूजन नव्याने सुरू केले, तर दरवर्षी हे पूजन करणे बंधनकारक नाही. पण ज्यांच्या घरात अगोदरपासून वंशपरंपरेने नवरात्रिपूजन सुरू असेल, त्यांनी दरवर्षी पूजन करणे आवश्यक आहे.

*     एखाद्या घरात जर अगोदरपासून सातत्याने नवरात्रिपूजन सुरू असेल तर पुढील पिढीतल्यांनी हे पूजन सुरू ठेवणे आवश्यक आहे.

*     एखाद्या व्यक्तीने नव्याने हे पूजन करण्यास सुरुवात केली, तर त्याने नव्याने पूजनास सुरुवात करताना असा संकल्प करावा की ‘पूजन पुढे सुरू ठेवायचे आहे किंवा नाही, हे पुढील प्रत्येक पिढी ठरवेल.’

*     चैत्र नवरात्रीतही हे पूजन करू शकतो.

*     घरातील अन्य मंगल, शुभ प्रसंगी असे पूजन एका दिवसासाठी करू शकतो. अशा एक दिवसीय पूजनाच्या वेळी परातीत गहू घेऊन त्यावर अंबज्ञइष्टिका ठेवून पूजन करावे व नंतर ते गहू गरजूस दान करावे.

*  श्रद्धावानांनी त्यांच्या जुन्या पद्धतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही. परंतु वरील पद्धतीने पूजन केल्यास नवरात्रिपूजनातील त्रुटी व चुका वा व्यक्तिगत दोष ह्यांचा परिणाम होत नाही.